मुंबई : मुंबईत स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तसे आकडेवारीही शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे, मात्र आता पावसाने काही दिवसांपासून दांडी मारल्यानंतर वातावरणात उष्मा वाढला आहे. त्यामुळे विषाणू व संसर्गासाठी पोषक असलेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास मुंबईकरांना भेडसावू लागला आहे. बदलत्या हवामानामुळे ॠर्हायनोव्हायरल संसर्गा’चे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातत्याने शिंका येऊन नाक चोंदणे, सर्दी होऊन घसा दुखणे, खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये वाढले आहे. या लक्षणांमुळे हैराण झालेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ठिकठिकाणी सर्दी आणि खोकणारे आसपास असल्यास, त्याचा संसर्ग स्वतःला होऊ नये, यासाठी सावधनागता बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वातावरणातील बदलाचे परिणाम
या प्रकारच्या आजारांमध्ये डोळ्यांतून, नाकातून पाणी येते, सर्दीमुळे नाक सतत गळत राहते, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखी वाटते, घसा खवखवण्याची लक्षणे पहिल्या टप्प्यात दिसतात.वातावरणात ऊन-पाऊस असा बदल सातत्याने झाला नाही, तर दोन ते चार दिवसांमध्ये हा खोकला बरा होतो. पण तरीही सर्दी खोकल्याकडे किरकोळ आजार म्हणून न पाहता यासाठी योग्य प्रकारे वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अस्वच्छतेचा परिणाम
घरात अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत माशा घोंगावतात. स्वच्छता कितीही केली तरीही घरात धूळ येते. घरामध्ये स्वच्छता ठेवल्याने संसर्गजन्य आजारांना आळा राहतो. पावसाळा असल्याने पाणी पिण्याची क्षमताही मंदावते. मात्र, त्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये तयार होऊन ती त्रासदायक ठरू शकतात, याकडेही वैद्यकीय तज्ञांनी लक्ष वेधले आहे. घरी बनवलेला पोषक आहार घेतला, तर पोटाचे विकारही होण्याची शक्यता कमी होते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.