मुंबईतील इमारतींना आशेचा किरण

0

मुंबई । मुंबईतील ओसी नसलेल्या अनेक इमारतींचा पुनर्विकास होताना त्यान फंजीबल एफएसआयचे फायदे देता येतील का? याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्याबाबत सरकार अभ्यास करून सकारात्मक विचार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांच्या मागणीवर ही घोषणा केली.

विधानसभेत आज गोरेगाव येथील पुनर्विकास रखडलेल्या भगिरथ कंडोमियमच्या प्रश्‍नाबाबत लक्षवेधी सूचना चर्चेत आली होती, यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा प्रश्‍न उपस्थित केला. मुंबईतील अनेक इमारतींना ओसी मिळालेली नाही यातील अनेक इमारती या जुन्या असून, विकासक पळून गेलेले आहेत, अशा इमारती आज मोडकळीस आल्यास पुनर्विकास होत असताना या इमारतींना फंजीबल एफएसआयचे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारे होत नाहीत व पर्यायाने ते रखडतात म्हणून या इमारतींना फंजीबल एफएसआय देण्याबाबत सरकार विचार करेल काय? अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरसकट सर्वांनाच याचा फायदा द्यायचा झाल्यास सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल काही इमारतींना एखाद्या रहिवाशाचा चुकीमुळेदेखील ओसी मिळत नाही व त्याचा फटका सर्व रहिवाशांना बसतो आणि म्हणून आमदार आशिष शेलार यांनी केलेली सूचना तत्त्वतः स्वीकारून सरकार अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत विचार करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे मुंबईतील हजारो सदनिकाधारकांना दिलासा मिळाला असून पुनर्बांधणीला गती मिळण्याची शक्यता आहे.