मुंबई: उद्या २९ तारखेला मुंबईतील सर्व लोकसभा मतदार संघात मतदान आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईतील झोपडीधारक आणि भाडेकरूंना हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर झोपडपट्टीधारकांना व भाडेकरूंना हक्काचे घर मिळेल असा शब्द राहुल यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
१ मार्च या दिवशी मुंबईत झालेल्या पक्षाच्या सभेत मुंबईकरांना किमान ५०० चौरस फुटांचे पक्के घर देण्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. याचा उल्लेख राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या सभेत काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या हक्काच्या घराच्या प्रस्तावाला आपण पाठिंबा दिला असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबईतील मतदार मोठ्या संख्येने झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. त्याच प्रमाणे मुंबईतील भाडेकरूंची संख्याही लक्षणीय आहे. मुंबईवर अनेक दशके प्राबल्य मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे हा मतदार जमेची बाजू होती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हा मतदार टिकवता आला नव्हता. ही घोषणा करून राहुल गांधी यांनी हक्काच्या घराचे आश्वासन देत हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.