मुंबईत जमावबंदी !

0

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने राज्यसरकारने मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जीम आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि विनाकारण प्रवास करणं टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.