ठाणे : पावसाने ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रस्ते अपघातात एका 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. प्रियांका झेंडे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. ती लोकमान्यनगर भागात राहणारी आहे.
प्रियांका ही तिची मैत्रीण संघवी बोकाडे हिच्यासोबत पावसाची मजा घेण्यासाठी घोडबंदर रोडवर दुचाकी घेऊन गेली होती. तिथून परतत असताना नागला चौकी भागात मुसळधार पावसामुळे गाडी चालवणाऱ्या संघवीला समोरचा टँकर दिसला नाही आणि गाडी घसरुन मागे बसलेली प्रियांका थेट टँकरखाली आली. तिच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकी चालवणाऱ्या संघवीने हेल्मेट घातलेले असल्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र मागे बसलेल्या प्रियांकाला आपला जीव गमवावा लागला. ठाण्यासह मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाण्यातील अनेक भागात पाणी तुंबलेले ही पाहायला मिळाले. रस्त्यावर पाणी साचलेलं असल्यामुळे वाहन चालवताना अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे.