मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या हिताचाच-मुख्यमंत्री

0
नागपूर : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून देशाच्या व राज्याच्या विकासासाठी असे प्रकल्प उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी ठाणे व पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही.  काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे. शेतकऱ्यांची व ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जन सुनावणी सुरु आहे. जन सुनावणीद्वारे सल्ला मसलतीचा उद्देश या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करणे हा आहे. यात ग्रामसभांचे महत्व कुठेही कमी होऊ दिले जाणार नाही. वन जमिनींचे कायदे काटेकोर पालन केले जाईल. वन क्षेत्राचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गुजरात मधील शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्याबाबत कोणतेही वेगळे धोरण आखण्यात आलेले नाही. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य भाई गिरकर, आनंद ठाकूर, डॉ.नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण आदींनी सहभाग घेतला.