मुंबई थांबणारच नाही का?

0

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, असे म्हटले जाते. मुंबई आता 24 तास खुली ठेवण्याचे तरतूद असलेले विधेयक नुकतेच विधान परिषदेत मंजूर झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने याबाबत वाच्यता केली होती, त्यावेळी राज्य सरकारला नागरिकांच्या टिकेला सामोरे जावे लागले होते. मुंबईने परराज्यासहीत राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मुंबई ही सोन्याचे अंडी देणारे कोंबडी आहे. त्यामुळेच मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट करण्याकरता पुर्वीचे प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी व इतर नेत्यांनी प्रयत्न केले होते. परंतु मराठी माणूस जागा झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. मुंबई अखेर महाराष्ट्रातच राहिली. आताही मुंबईवर गुजरातवासियांची नजर आहे,असे म्हटले जाते. मराठी माणूस आता वाएत्या महागाईला कंटाळून मुंबईबाहेर चालता होत आहे. तो कल्याण- अंबरनाथ- कसारा- कर्जतकडे निघाला आहे. पुर्वीच्या मराठी गिरगावात आता किती मराठी लोक राहिले आहेत, हे पाहिले तर मराठी माणूस मुंबईतून परागंदा होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने मुंबईला चोविस तास कामाला जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, चित्रपटगृहे , सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे आता चोवीस तास सुरू राहणार आहेत. यासाठी भाजपचे राज्य सरकार कामाला लागले आहे. यामागे प्रधानमंत्री मोदी व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे डोके असणार आहे. सध्याच्या वाढत्या व्यापार स्पर्धेत लहान-मोठ्या दुकानांसह मॉल्सचा टिकाव लागावा, या विवंचनेपोटी राज्य सरकारचा हा अजब प्रयत्न सुरू आहे. ऑनलाइन शॉपिंगचे वाढते प्रमाण यामुळे छोटे-मोठे दुकानदार व मॉल्स अडचणीत आले
आहेत.

यासाठी विविध दुकाने, बार, परमिट रूम, स्पा, पार्लर, हॉटेल्स रात्रभर म्हणजे रात्री साडेनऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. राज्य सरकारने हा निर्णय घेतला खरा; परंतु मुंबई चोविस तास सुरू झाल्यानंतर येणाऱया आपत्तींना राज्य सरकार कसे तोंड देणार आहे, याबाबत राज्य सरकारने अजुन तरी निर्णय घेतला नसल्याचे दिसते. कारण मुंबई पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तर सुरू असते. नंतर काही बार, हॉटेल्स बिनदिक्कत पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू असतात. काही ठिकाणीच नावापुरती कारवाई होते. मुंबईत त्यामुळे अधिक पैसा (राज्य व केंद्र सरकारकडे महसूल) गोळा होतो. केंद्र सरकारने जीएसटी सुरू करतानाच मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न बंद केले आणि मुंबई महानगरपालिकेला त्याची भरपाई म्हणून काही रक्कम वर्षाकाठी देण्याचे ठरवले आहे. याबाबत मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नाराजी दर्शवली होती. कारण मुंबईचे मिळणारे उत्पन्न भरपूर आहे. केंद्र सरकारने वर्षाला निधी देऊनही पुर्वीसारखा महसूल आता मिळणार नाही, याची मुंबई मनपातील सत्ताधाऱयांना जाणीव आहे. तर अशी ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी मुंबई केंद्र व राज्य सरकारने 24 तास वापरण्याची खास युक्ती शोधली आहे. काहीही करा, पण पैसा कमवा असे व्यापारी तत्व या सरकारने सुरू केल्याचे दिसत आहे. कधीकधी जास्त फायदा काढण्याच्या नादात माणसाचे कायमचे नुकसान होत, असे म्हणतात. मुंबईची संस्कृती बिघडवण्याचे काम सरकारचा हा निर्णय करणार आहे, असे दिसत आहे.

– विशाल मोरेकर
9869448117
जनशक्ति प्रतिनिधी,मुंबई