मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकने बाइकस्वारांना चिरडले

0

पुणे: मुंबई-पुणे महामर्गावर रात्री साडे दहाच्या सुमारास आयशर ट्रकने तीन बाइक्सना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण लघवीला बाजूला गेलेला असल्याने बचावला आहे.अपघातातील सर्व प्रवासी हे तळेगाव एमआयडीसीमध्ये काम करणारे होते. तीन मोटारसायकल घेऊन ते अलिबागला फिरण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना खोपोलीजवळच्या बोर घाटातील अंडा पॉइंट येथे लघवीला थांबले होते त्या ठिकाणी हा भीषण अपघात घडला.

पुण्याकडून येणारा आयशर ट्रक एमएच ४६ बीबी १८३० उलटून या तीन मोटारसायकवर आदळला. त्यात चौघे जागीच ठार झाले. तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बालाजी हरिसचंद्र भंडारे ३५ हा गृहस्थ लघवीसाठी बाजूला गेल्याने वाचला आहे. प्रदीप प्रकाश चोले वय ३८, अमोल बालाजी चिलमे ३०, नारायण राम गुंडाळे २८, गोविंद ज्ञानोबा नलवाडे, निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे २८ असे मृतांचे नाव आहेत. नोकरीच्या निमित्तानं ते तळेगावातील वराळे फाटा इथं राहत होते.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस, आयआरबीचे पथक घटनास्थळी मदतीसाठी धावून आले. त्यांनी अपघातग्रस्तांना ट्रकच्या खालून काढून खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यापैकी चौघांचा आधीच मृत्यू झाला होता. तर, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.