मुंबई बॉम्बस्फोटात अबू सालेम, डोसा दोषी

0

मुंबई । अवघ्या मुंबईला 1993 साली हादरवून टाकणार्‍या बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर आज (शुक्रवारी) निकाल लागला. विशेष टाडा न्यायालयाने याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सात जणांना दोषी ठरवले आहे. तसेच अब्दुल कयुम शेख याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 1993 साली झालेल्या या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 713 जण जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दूल रशिद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी, अब्दुल कयुम शेख आणि करीमुल्लाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

निकालाकडे लागले होते लक्ष
मुंबईत झालेल्या 1993 सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी आज विशेष टाडा न्यायालयात टप्प्याटप्प्याने प्रत्येक आरोपीसंदर्भात निकाल देण्यास सुरूवात झाली. यावेळी सर्वप्रथम हत्या आणि बॉमस्फोटाचा कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ताहिर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्लाह खान, रियाज सिद्दीकी आणि अबू सालेम यांना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे विशेष टाडा न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

असे होते आरोप
स्फोटासाठी आरडीएक्स मुंबईत घेऊन आलेल्या डोसावर हत्या आणि कटाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मुस्तफा डोसाने दुबईत बसून आपल्या हस्तकांच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा पाठवला गेला होता. रायगड जिल्ह्याच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनार्‍यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. तर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि कटाच्या गुन्ह्यात अबु सालेम दोषी ठरला आहे. आता येत्या सोमवारपासून त्यांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद सुरू होणार आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2015 मध्ये त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपींची ही दुसरी तुकडी होती. या सगळ्यांना 2003 ते 2010 या काळात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पहिला खटला संपत असताना हे सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सीबीआयचे आरोपत्र
मुुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलींचा आणि बाबरी मशिद पाडली गेल्याचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी कट रचून 31 साथीदारांच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात पहिल्यांदाच एखाद्या दहशतवादी हल्ल्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स वापरले गेल्याचे, सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. दरम्यान, आज न्यायालयाने या सर्व आरोपींना दोषी ठरवल्यामुळे सीबीआय याकूब मेमनप्रमाणे मुस्तफा डोसासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करू शकते.