मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाना साधला आहे. ‘अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी…’ असं म्हणत मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असे आपल्या ट्वीटर अकाऊंट वर म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा दौरा लांबणीवर पडला होता. त्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येत जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्या मधील साधुसंतांनी विरोध केला आहे. शिवसेना यावर मनसेला काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.