मुख्यमंत्री, गृहखातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा!

0

औरंगाबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने राष्ट्रवादीचा संताप

मुंबई-महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यांच्या कुटुंबातील लोकं सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच काय होणार असा सवाल करतानाच मुख्यमंत्री तुम्ही करताय काय, तुम्हाला खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला. औरंगाबादमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीवर एका आयपीएस पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादची घटना समोर आलीय.आयपीएस अधिकारी महिला पोलिसांच्या मुलीवर बलात्कार करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलांचा छळ करत आहेत. त्यांच्या हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकून देत आहेत. या महाराष्ट्र पोलिस दलात चाललंय काय असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट केला आहे. या राज्यातील पोलिस महिला कर्मचारी, अधिकारी, त्यांचं कुटुंब सुरक्षित नाहीत तिथे राज्यातील महिला कशा सुरक्षित राहतील याबाबत राज्यातील जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून त्यातून राज्याचे मुख्यमंत्री अकार्यक्षम झालेले आहेत हे सिध्द झाले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यावर केला.