मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं; उपमुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करणार होते. मात्र, कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं आहे. कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरचं लँण्डिंग होऊ शकलं नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईला परतणार आहेत.

कोल्हापूरपासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अजित पवारांनी सांगलीपासून दौऱ्याला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी येथील निवारा केंद्राला भेट दिली. भिलवडी पाहणी करत असताना उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण होऊ शकलं नाही. त्यातच कोल्हापूरकडे जाणारे रस्ते बंद असल्यानं अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली. हेलिकॉप्टर उपलब्ध झालं, तर दुपारनंतर कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले.

पुराचा फटका बसणाऱ्या घरांसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला, यावेळी त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. ते म्हणाले की, भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली.