मुख्यमंत्र्याकडून मंत्र्यांची झाडाझडती सुरु!

0
मंत्र्यांच्या चार वर्षातल्या प्रभावी कामाचे मोजमाप, 5 मुख्य निर्णयाचे सादरीकरण 
निलेश झालटे,मुंबई: युती सरकारला सत्तेवर येऊन लवकरच चार वर्षे पूर्ण होत आहेत. आता चार वर्षपूर्तीच्या निमित्ताने हेच सरकार चार वर्षातील प्रभावी कामांचा शोध घेणे सुरु आहे. मंत्र्यांनी या चार वर्षात प्रभावी कोणते निर्णय घेतले याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची झाडाझडती सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी काही मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या प्रभावी निर्णयाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांसमोर महिला व बालविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महसूल, गृहनिर्माण, उद्योग, शिक्षण विभागातील प्रभावी निर्णयाचे प्रस्तुतीकरण त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी केले. सोमवारी ६ कॅबिनेट मंत्री आणि काही राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. आणखी दोन टप्प्यात उरलेल्या विभागांचे सादरीकरण होणार आहे. २८ सप्टेंबरला या झाडाझडतीचा दुसरा टप्पा होईल, त्यांनतर आणखी एक दिवस ठरवून त्या दिवशी तिसरा टप्पा होणार आहे.
प्रभावी 5 प्रमुख निर्णयाचे सादरीकरण
चार वर्षांत सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून अनेक कामे आणि महत्वाचे केल्याचा गाजावाजा केला आहे. विविध मंत्रालायांकडून आपापल्या विभागाच्या वतीने विकासकामांचा दावा केला गेला आहे.   या चार वर्षात प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून काय काम केले? याचा लेखाजोखा खुद्द मुख्यमंत्री सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि विभागाच्या सचिवांकडून घेत आहेत. या चार वर्षातील प्रभावी 5 प्रमुख निर्णयाचे सादरीकरण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या समोर सोमवारी झाले. या संदर्भात ऑगस्ट महिन्यात सर्व मंत्री राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील , प्रकाश मेहता, सुभाष देसाई, विनोद तावडे यांनी आपल्या विभागाच्या निर्णयाचे सादरीकरण केले. दुसरा टप्पा २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जनमानसावर परिणाम करणारे निर्णयच हवेत!
4 वर्षातील आपल्या विभागाने घेतलेल्या 5 प्रमुख निर्णयाचे सादरीकरण संबंधीत विभागाचे मंत्री राज्यमंत्री तसेच सचिव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे होत आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे हे पाचही मुद्दे प्रशायसकीय स्वरूपाचे न राहता केवळ जनमानसावर परिणाम करणारे असावे असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढे एका मंत्र्याने हे सादरीकरण प्रत्येकी 15 मिनिटात करायचे आहे. पाच प्रमुख निर्णय निवडताना काही महत्वाच्या बाबी या मंत्र्यांना द्यावयाच्या आहेत. यामध्ये त्या निर्णयामुळे लाभ झालेल्या लाभार्थ्यांची संख्या, त्या निर्णयाचा जनमाणसांसाठी दृश्य परिणाम, त्यासाठी केला गेलेला खर्च या बाबी येणे आवश्यक होत्या. यामुळे गेल्या सरकारमधील 15 वर्षांशी तुलनात्मक आकडेवारी , काही ठळक उदाहरणे आदी बाबींचा या सादरीकरणात समावेश होता.