मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या पैशांसह संसाराची राखरांगोळी

0

समतानगर येथे शॉर्टसर्किटने घराला आग 

नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

जळगाव- शहरातील समतानगर येथे शॉर्टसर्किटने रमजान अन्वर पिंजारी यांच्या घराला आग लागून त्यात मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या 20 ते 25 हजार रुपयांसह पैशांसह कपडे, टीव्ही यासह संसारउपयोगी वस्तूंची काही क्षणातच राखरांगोळी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच घरातील सिलेंडर हलविण्यात आल्याने दुर्घटना टळली.

समतानगरातील वंजारी टेकडी येथे रमजान अन्वर पिंजारी हे आई, पत्नी, मुलांसह राहतात. गवंडी काम तसेच हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह भागवितात. रमजान हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. तर त्यांची पत्नी परवीन हे वडीलांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पहायसाठी गेली होती. समीर व अरबाज तसेच मोठी मुलगी मुस्कान हे सर्व शाळेत गेले होते. घरी असलेल्या घरी मोसमबाई पिंजारी या घरी होत्या. मात्र शौचास गेलेल्या असताना अचानक घरातील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.

धुरामुळे रहिवाशांच्या लक्षात आला प्रकार
घरातून निघत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील धुरामुळे पिंजारी यांच्या घराशेजारील रामकृष्ण माळी यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गल्लीतील नशीर पठाण, इमाम पठाण, पंडीज जाधव, नाशिर पठाण, सुभाष राठोड, राहूल राठोड यांच्यासह बजरंग दल, राष्ट्रीय बंजार टायगर्सच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मदतीने छतावरील पत्रे बाजूला करुन दरवाजा उघडला. प्रथम घरातील सिलेंडर इतरत्र हलविण्यात आले. यानंतर आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली.

कसे करणार आता मुलीचे लग्न?
रजमान यांची मोठी मुलगी मुस्कान हिच्या लग्नासाठी पिंजारी कुटुंबिय स्थळ शोधत आहेत. यासाठी ते काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील मुलगा तसेच घर बघून आले होते. तसेच त्यांनाही जळगावाला येण्याचे निमंत्रण देवून आले होते. दोन ते तीन दिवसात ते मुलीला तसेच घर पहायला येणारच होते. त्यापूर्वीच दुर्घटना घडली. यात भिशीचे 20 ते 25 हजार रुपये मुस्कानच्या लग्नासाठी राखून ठेवले होते. ते घरातील एका लाकडी कपाटात ठेवले होते. तेही आगीत जळून खाक झाले आहेत. आधीच हलाखीची परिस्थिती व त्यातच जमविलेले पैशांची राखरांगोळी झाल्याने मुलीचे लग्न कसे करणार असा प्रश्‍न पिंजारी कुटुंबियांना पडला आहे.