मुले पळविण्याच्या संशयावरून मारहाण प्रकरणी 23 जणांना अटक

0

पिंपळनेर । मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच जणांना बेदम मारहाण करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. रविवारी साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक राईनपाडा येथे बेभान जमावाने पाच भिक्षुकांना ठेचून मारले. यात चौघे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मृत पाचही जण प्राणाची भीक मागत असताना क्रौर्य इतके पेटले होते की ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन या भिक्षुकांना लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: तुडवण्यात आले. त्यानंतर काहींनी चपला, दगडविटांनी ठेचले. यातच पाचही जणांनी प्राण सोडले.

थरकाप उडवणार्‍या या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी आले. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पिंपळनेर परिसरात प्रचंड तणाव असून, नाशिक, नंदुरबार येथून पोलिस कुमक मागवण्यात आली. मृतांमधील चौघे सोलापूर जिल्ह्यातील असून ते नाथपंथी डवरी समाजाचे आहेत. भीक मागून ते उदरनिर्वाह करीत. याप्रकरणी सायंकाळपर्यंत 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, मृत पाचही जण आपल्या 15 सदस्यीय कुटुंबीयांसह पिंपळनेर गावाजवळ राहत होते. पिंपळनेर पोलिसांकडे या लोकांबाबत तशी त्यांची नोंदही होती.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावापासून 25 किमीवर राईनपाडा गावात रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात आजूबाजूच्या गावांतील आठ-दहा हजार ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. यात इतर जिल्ह्यांतून मोलमजुरीसाठी आलेल्या मजुरांचा प्रामुख्याने समावेश असतो. गावात सकाळी एक बस आली. बसमधून पाच अनोळखी व्यक्ती उतरल्या. परंतु त्यांच्यासाठी हा अखेरचाच दिवस ठरला.

एका संशयिताने मुलीला नाल्याकडे नेल्याची अफवा
बसमधून उतरलेल्या पाच जणांपैकी एकाने सहा वर्षांच्या मुलीला बहाणा करून गावातील नाल्याकडे नेल्याची अफवा बाजारात पसरली. त्यामुळे अनोळखी पाच जण मुले पळवणार्‍या टोळीतील असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या मनात घर केले. काही ग्रामस्थ या संशयितांची विचारपूस करत होते. तेवढ्यात काहींनी मारहाण सुरू केली. काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातून तीनशे ते पाचशे जण आले आहेत. ते लहान मुले पळवतात, किडन्या काढून विकतात, असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत होते. यामुळे भीतीचे वातावरण आहे. या मेसेजमुळे राईनपाडा येथे आलेल्या पाच जणांवर संशय बळावला. घटनेनंतर काही मिनिटांत हत्याकांडाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.

ग्रामपंचायत कार्यालयात हिंसेने घेतले जीव
बाजारपेठेतील ग्रामपंचायत कार्यालय रविवारी बंद होते. ग्रामस्थांनी कुलूप तोडून पाच जणांना मारहाण करत कार्यालयात नेले. दगड, विटा, लोखंडी सळया, प्लास्टिक खुर्च्या अशा हाती येईल त्याने दोनशे ते तीनशेचा जमाव पाच जणांवर तुटून पडला.

मोबाइलमुळे मृतांची ओळख पटली
मारहाणीत मृत्यू पावलेल्या पाचही जणांची ओळख मृतांपैकी एकाच्या खिशातील मोबाइलमुळे पटली. भारत शंकर भोसले (वय 45), भारत शंकर माळवे (45), दादाराव शंकर भोसले (36, खावे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), आगनूक ऊर्फ अप्पा श्रीमंत इंगोले (19, मानेवाडी हुन्नुर, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) व राजू भोसले (47, गोंदवून, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.