मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क तुटला

0

गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद पडले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे.दरम्यान, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान मोठे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाणी शहरात घुसले आहे. या पुरामुळे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी हेलिकॉप्टरमधून येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे. हवामान खात्याने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.