मृत्युदंडासाठी फाशीच सर्वोत्तम पर्याय

0

नवी दिल्ली : मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना गोळी घालून किंवा इंजेक्शन देऊन मारण्यापेक्षा फाशी देऊन मारणेच योग्य असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून हे स्पष्ट केले आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाते. त्यामुळे अशा शिक्षेला फाशीच योग्य असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

अन्य पर्यायासाठी याचिका
ऋषी मल्होत्रा नावाच्या एका वकिलाने फाशीवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. आरोपीला मरतेवेळी कोणताही त्रास होऊ नये म्हणून मृत्युदंडाच्या शिक्षेला फाशीऐवजी अन्य पर्याय असावा असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. फाशीच्या शिक्षेमुळे व्यक्तीचा सन्मानाने मरण्याचा अधिकार हिसकावला जातो, असंही या याचिकेत नमूद करण्यात आले होते. या याचिकेविरोधात केंद्र सरकारने सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मृत्युदंडाच्या शिक्षेला फाशीशिवाय कोणताच दुसरा पर्याय नाही. इंजेक्शन देणे, गोळी घालून मारणे आणि इलेक्ट्रिक खूर्चीवर बसवून करंट देऊन मारणे आदी प्रकार अमानवीय आणि वेदनादायक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.