चोपडा । छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला व्यवस्थापन कौशल्य शिकवणारे एक महान राजे होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या पाया रोवताना अनेक सामाजिक बदल, अनिष्ट रूढी परंपरा यांना छेद देण्याचे देखील काम केले. त्यांनी सामाजिक जाणीव असलेला व एक कर्तव्यनिष्ट समाज घडविण्याचे काम देखील केल. पण आज दुर्दैवाने याचा कुणीही विचार करत नाही. स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांना साथ दिलेले शिलेदार जर नसते तर कदाचित समाजाने प्रगती केली नसती. महाराजांच्या कार्यकाळात बांधले गेलेले गडकोट आजही स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना व महाराष्ट्राच्या वैभवाचे प्रतिक आहेत. कितीही समस्या आल्या तरी न डगमगता त्यांना तोंड देणे हेच महाराजांच्या चारीत्र्यातून शिकावयास मिळते, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्रा.मनोहर मराठे यांनी सांगितले. येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती: यावेळी सर्वप्रथम ईशस्तवन, सरस्वती व छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात पुढे शिवनेरी या महाराजांच्या गड किल्ल्यांच्या बाबतीत माहिती देणार्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. छत्रपतींच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न स्नेहल पाटील, दिपाली माळी, अश्विनी धनगर यांनी केले. तर प्रा. रुपेश नेवे यांनी महाराजांच्या दूरदृष्टी, व्यवस्थापन, गनिमी कावा, याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा.योगिता बोरसे, प्रा. अर्चना सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रियंका माळी हिने केले तर आभार जयश्री जाधव हिने मानले.