मेगाभरतीतच महाविकास आघाडी सरकारची बीजे

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा गौप्यस्फोट

जळगाव – मेगा भरतीमुळेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फटका तर बसलाच शिवाय भाजपने सरकार घालवले. या मेगाभरतीतच महाविकास आघाडी सरकारची बीजे रोवली गेल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ते जळगाव मध्ये बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे पुढे म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काळात मेगा भरतीला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मेगा भरतीला जोर आला. भाजपने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. मात्र, ही मेगा भरती करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले, अशा नेत्यांनाच स्थान देण्यात आले.

शिवरायांच्या वंशजांकडून पुरावे मागणे मूर्खपणा

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच आता खर बोलण्याची हींमत दाखविल्याने मी त्यांचे अभिनदंन करतो असेही खडसे म्हणाले. यावेळी खडसेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर देखील टीकास्त्र डागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचेच नाही तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. राऊत यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी राऊत यांच्या इंदीरा गांधी यांच्या व्यक्तव्यावर बोलंतांना एकत्र सरकार असल्याने त्यांनी असे बोलणे टाळले पाहीजे असेही सांगीतले.

मेगा भरतीचा फटकापक्षालाच नाही तर माझ्यासारख्या जेष्ठ नेत्यांनादेखील बसला

याठिकाणी भाजपच्या राज्य नेतृत्त्वाने आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्यानंतर मेगा भरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटांची खैरात वाटली. परंतु, झाले उलटेच. ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले. मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसला आहे, असेही खडसे म्हणाले.