मोठी बातमी: उद्यापासून जिल्हाबाह्य एसटी सेवा सुरु होणार

0

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली एसटी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसानीचा सामना महामंडळाला करावा लागला आहे. सध्या जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरु आहे. मात्र निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. त्यातून खर्च निघनेही कठीण झाले आहे. प्रवाशांकडून सातत्याने एसटीची जिल्हाबाह्य सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर, आज १९ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने आंतरराज्य एसटी सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, उद्या 20 ऑगस्टपासून बससेवा सुरु होत आहे.

मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केले असून राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीकडून आणि वाहनांकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबण्यास आळा बसेल. गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, गरिबांच्या हक्काच्या लालपरीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झालं आहे. आता, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनचे नियम पाळून लालपरी पुन्हा रस्त्यावर लांब पल्ल्यासाठी धावणार आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या-येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.