मोदींकडे बोट दाखवणार्‍यांचे हात कापू

0

पाटणा : बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच उजियारपूर मतदारसंघाचे खासदार नित्यानंद राय यांनी ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मोठे वादग्रस्त विधान केल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणार्‍यांचे हात कापू, अशी गुंडगिरीची भाषा वापरली आहे. असंख्य अडथळे पार करुन मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींकडे बोट दाखवणार्‍यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी भाजप समर्थकांना केले आहे. या कार्यक्रमात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हेदेखील मंचावर उपस्थित होते.

प्रत्येकाने मोदींचा आदर केला पाहिजे
मोदींना त्यांची आई ज्या ताटात जेवण वाढायची त्या ताटात दोघांनाही एकमेकांचे चेहरेदेखील दिसायचे नाहीत. अशा गरीब कुटुंबातून आलेले मोदी आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. प्रत्येकाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे आणि प्रत्येकाने त्यांचा आदर केलाच पाहिजे, असे राय म्हणाले. मोदींकडे बोट दाखवणार्‍यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजेत किंवा थेट कापले पाहिजेत, असे चिथावणीखोर विधान त्यांनी केले.

राय यांच्याकडून सारवासारव
अशाप्रकारे चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. यानंतर सारवासारव करताना नित्यानंद राय म्हणाले, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. देशाची सुरक्षा आणि अभिमानावर संकट आल्यास आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मला म्हणायचे होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे राय यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, भाजप अभिमानावर कसे भाष्य करु शकते?, त्यांच्याकडे अभिमानास्पद काहीच नाही.