नवी दिल्ली – भारत-चीनसीमा वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सक्रियता दाखवताच चीनचा सूर बदलला आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारतातील चिनी राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे. तर चीन सरकारच्या प्रॉपगॅन्डा मॅगझीन ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की चीन आणि भारताला सध्या सीमेवर सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची आवश्यकता नाही.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचे पाहायला मिळते आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. या वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले, भारत वास्तविक सीमा रेषेवर शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच भारतीय सैनिक सीमेवरील व्यवस्थापनासंदर्भात अत्यंत जबाबदारीने कार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते ट्रम्प?
ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे. चीनीच्या परराष्ट्र मत्रालयाकडून ट्रम्प यांच्या ट्विटसंदर्भात कसल्याही प्रकारची आधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की दोन्ही देशांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या, मदतीची आवश्यकता नाही. या लेखात म्हणण्यात आले आहे, की सध्याचा वाद भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यास सक्षम आहेत. या भागातील शांतता आणि सद्भावना नष्ट करण्याची नेहमीच संधी शोधणार्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावध रहायला हवे.