चीनकडून अतिक्रमण: मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले आहे. चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केले आहे असे विरोधी पक्षांकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र सरकारने ते मान्य केले नाही. चीनने भारताच्या भूभागावर अतिक्रमण केले नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र आज मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनने लडाखमधील भारतीय जमीनीवर कब्जा केल्याचे कबूल केले. राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष केले आहे. ट्वीटकरून राहुल गांधींनी सरकारला लक्ष केले आहे.

पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली आहे. खुद्द संरक्षण मंत्र्यांनीच त्याची माहिती दिली आहे. “संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले की, मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली. आपला देश नेहमी लष्करासोबत उभा होता आणि राहिल. पण, मोदीजी, आपण केव्हा चीनविरोधात उभे राहणार आहात? चीनकडून आपल्या देशाची जमीन कधी परत घेणार? चीनचे नाव घ्यायला घाबरू नका,” असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.