नवी दिल्ली । काँग्रेसच्या दिल्ली येथील संविधान बचाव रॅलीसमोर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’, असा सरकारचा नारा होता. पण मोदी देशाच्या मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरले. त्यांनी 4 वर्षांत भारताची प्रतिष्ठा घालवली. आता ‘भाजपपासून मुलींना वाचवा’, असा नवा नारा देण्याची वेळ ओढावल्याचे ते म्हणाले. मोदींनी त्यांच्या पुस्तकात म्हटले की वाल्मीकी समाजातील व्यक्ती जे काम करतात ते फक्त पोट भरण्यासाठी नसते. ते अध्यात्मासाठी हे काम करतात. यातून मोदींची मानसिकता दिसून येते. त्यांच्या मनात दलितांसाठी जागाच नाही, असे राहुल गांधींनी सांगितले.
मोदींच्या मनात गरीब, महिला आणि दलितांसाठी जागा नाही. देशात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. या देशाचे संविधानच महिला, दलित आणि गरिबांचे रक्षण करणार, असे त्यांनी सांगितले. देशाला संविधान काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आयआयटी, आयआयएम आणि निवडणूक आयोगसारख्या संस्था या संविधानामुळेच मिळू शकल्या. संविधानाशिवाय काहीच शक्य झाले नसते. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हा संविधानाचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. जनता न्यायाधीशांकडे न्याय मागते. पण आता देशातील न्यायाधीश जनतेकडे न्याय माागू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.