मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला वर्षभर तुरुंगवास !

0

इंफाळ-पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर आणि सरकारवर टीका करणे मणिपूरच्या एका पत्रकाराला चांगलेच भोवले आहे. किशोरचंद्र वांगखेम या पत्रकाराला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किशोरचंद्र यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

सर्वप्रथम त्यांना २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी पश्चिम इंफाळमधल्या कोर्टाने त्यांना ७० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.

मात्र, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळाने किशोरचंद्र यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्याचे आदेश काढले.

किशोरचंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे. रासुकाअंतर्गत कोणालाही कमाल १२ महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते. भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद्र यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे.