मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या काळात घरातच राहून काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोदी देखील घरूनच काम करत आहेत, राज्याचे गृहमंत्री देखील घरूनच काम पाहत आहेत असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आज गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर अॅम्बुलंस सेवा मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी केली जाईल, तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.