मोदी सरकारच्या काळात भूकबळीत मोठी वाढ; जीएचआय चा अहवाल

0

नवी दिल्ली : ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 (GHI) चा अहवाल जारी करण्यात आला असून भूकबळी संपविणाऱ्या देशांच्या यादीत भारत आणखी पाठीमागे पडला आहे. या अहवालानुसार 119 देशांच्या यादीत भारत 103 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या यादीत भारत 100 व्या स्थानावर होता. त्यामुळे, केंद्रातील मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळीची समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत सातत्याने मागे पडत चालला आहे. भूकबळी संपविणाऱ्या देशांच्या या यादीत 2014 मध्ये भारत 55 व्या स्थानावर होता. त्यानंतर, सन 2015 मध्ये हे स्थान 80 पर्यंत जाऊन पोहोचले होते. तर 2016 मध्ये 97 आणि 2017 मध्ये 100 अशी घसरण भारताची झाली आहे. मात्र, यावर्षी 2018 मध्ये भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर या यादीत पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर आहे. पण, ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो, तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांचा अभ्यास केल्यास, देशातील भूकबळी संपविण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

ग्लोबल हंगर इंडेक्सकडून जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळीचे आकलन करण्यात येते. भूकबळी कमी करण्याच्या लढाईतील प्रगती आणि समस्यासंदर्भात दरवर्षी संस्थेमार्फत एक सर्वेक्षण केले जाते. देशातील किती नागरिकांना गरजेनुसार जेवण मिळत नाही, याचा अहवाल या संस्थेकडून तयार करण्यात येतो. म्हणजे, देशात किती प्रमाणात कुपोषण आहे, याचा अभ्यास या संस्थेकडून केला जातो. त्यामध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिमुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे. तसेच यामध्ये बालमृत्यू दर किती, हेही तपासण्यात येते.