असदुद्दीन ओवेसी यांचा सरसंघचालकांवर निशाणा
नवी दिल्ली : राम मंदीर अयोध्येतच बांधले जाईल, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कोणत्या अधिकाराने करत आहेत? भागवत कोण आहेत? ते देशाचे सरन्यायाधीश आहेत का? असे प्रश्न विचारत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांच्यावर निशाणा साधला. कर्नाटकमधील उडुपी येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येतील रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच होईल. दुसरी-तिसरी कुठलीही वास्तू तिथे उभी राहू शकत नाही. त्यांच्या या विधानाचा समाचार ओवेसी यांनी घेतला.
भागवतांचा दावा कोणत्या आधारावर?
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अयोध्येतच राम मंदिर होईल, असा दावा मोहन भागवत कोणत्या आधारावर करू शकतात? भागवत स्वत:ला देशाचे सरन्यायाधीश समजतात का? असा टोला ओवेसींनी लगावला. अयोध्येत पुढील वर्षी 18 ऑक्टोबरपासून राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र जैन यांनी केले आहे. त्यावरही ओवेसी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला कोणता आधार आहे?, विहिंपला अशी काही आतली माहिती मिळाली आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला.