संगमनेर: महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे भाजपात प्रवेश करणार असा दावा राधाकृष्ण पाटील यांनी केला होता. त्यावर आज बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून, आमच्या पक्षातील काही चांगले लोक तुमच्या पक्षात पाठवतो, हे सांगण्यासाठी मी भेटलो असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी थोरात भाजप मध्ये जाण्याच्या विचारात होते, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल केला होता. त्यांना उत्तर देताना थोरात यांनी हा टोला लगावला आहे.राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही. काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलोय आणि यापुढेही करत राहणार आहे. सर्वांना काही स्वभाव माहिती असतात, त्यातून काही अंदाज बांधले जातात. आता सत्ता बदलली आहे, तर कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असावी, असे थोरात म्हणाले.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना थोरात आणि विखे यांना एकाच सोफ्यावर शेजारी बसण्याचा अनोखा प्रसंग घडला. संगमनेर तालुक्यातील विवाह सोहळा यासाठी निमित्त ठरलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी चक्क राधाकृष्ण विखे यांना शेजारी बसवून घेतले.