मुंबई: कोरोना यंदाचे ७३ वे स्वातंत्र्य दिन दरवर्षी प्रमाणे साजरा धूम-धडाक्यात करण्यात येणार नाही. काही अटी-शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लॉकडाऊन नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था किंवा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी संख्येत हा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्याला शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडिल, कोरोना योद्धा आणि कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना आमंत्रित करावे, असेही सूचविण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर, राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होईल. राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात पालकमंत्र्याच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे फिजिकल डीस्टन्सिंग ठेवून, लॉकडाऊनची नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा, असेही सांगण्यात आले आहे. देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचे आयोजन करावे. त्यासोबतच, घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन हाती तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.