यशाचा आलेख उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा – महापौर राहूल जाधव

0
12 दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देवून सन्मान
पिंपरी : आई-वडील व शिक्षकांच्या कष्टाची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून आपल्या यशाचा आलेख उंचीवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे महानगरपालिकेच्या विद्यालयातून शालांत परिक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, कार्यालयीन अधिक्षक सोमा आंबवणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांनी जास्त मेहनत घ्यावी
यावेळी महापौर राहुल जाधव पुढे म्हणाले की, आज या समारंभात 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे एकुण 20 विद्यार्थी आहेत. पुढील वर्षी ही संख्या दुप्पट झाली पाहीजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता शिक्षकांनी जास्त मेहनत घेतली पाहिजे. कारण हे विद्यार्थी म्हणजे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. शहराचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात आहे. विद्यार्थ्यांनी आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. ज्याप्रमाणे दहावीत यश प्राप्त केले आहे, त्याप्रमाणे 12 वी व त्यानंतरच्या उच्च शिक्षणातही अशाच प्रकारचे सातत्य ठेवा. अडचणी येत असतात, त्यामुळे आपण निराश व्हायचे नाही. अभ्यासात दुर्लक्ष व टाळाटाळ करु नका. वाम मार्ग स्वीकारु नका. तुमच्या उज्वल भविष्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तुमच्या पाठीशी उभी राहिल. महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
महापालिका सोयी देणार
यावेळी बोलताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, आपले महापौर जाधव व मी आम्ही दोघांनी जिल्हा परिषेदेच्या व महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषेदेच्या शाळेत शिक्षण घेऊन राहुल जाधव हे महापौर झाले आहेत. त्याच प्रमाणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आयएएस झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांना व विदयार्थ्यांना महापालिकेमार्फत सोयी सुविधा  मोठया प्रमाणात दिल्या जाणार आहेत. परंतु शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. त्यानंतर महिला बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा केला सन्मान
यावेळी 12 दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देवून सन्मान करण्यात आला. 90 ते 100 टक्क्यांपर्यंत गुण प्राप्त केलेल्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाखाप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 20 लाख रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये कैन्हयाकुमार झा, रोशन सोनवणे, सुचिता पुजारी, आयेशा पठाण, मसीरा शेख, काजल लवटे, भाग्यश्री शिंदे, अनिश पोवार, आकांशा काटे, आश्‍विनी नरळे, ओंकार चव्हाण, कृष्णा धोकटे, यश बाबर, समर्थ पानसरे, सुनिल राठोड, ईशा मखीजा, सोनाली आसवले, अमित शेळके, मोनिका बोरकर, सना शहा यांचा समावेश होता. माध्यमिक शालांत परिक्षेत 85 ते 89.99 टक्के गुण प्राप्त केलेल्या एकूण 34 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यात आले. तर 80 ते 84.99 टक्के गुण प्राप्त करणार्‍या एकूण 60 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी केले, तर सुत्रसंचालन नरेंद्र बंड यांनी केले. आभार नंदिनी बांदल यांनी मानले.