यावल तालुक्यात केळी बागेला आग : पाच लाखांचे नुकसान

यावल : तालुक्यातील गिरडगावजवळ केळीच्या बागेला आग लागून साडेपाच हजार केळी खोड जळाल्याने दोन शेतकर्‍यांचा सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. यावल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले.

अचानक लागली आग
गिरडगाव येथील आदिवासी पावरा वस्तीला लागून गोरख पाटील व बापू ठाकूर (रा.किनगाव) यांची शेती आहे. या दोन्ही शेतात केळी लागवड केली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या शेतांमध्ये अचानक आग लागली. ही घटना लक्षात येताच पोलिस पाटील अशोक पाटील, एस.टी. चालक भैय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने अग्निशमन बंब बोलवले. पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी व प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन पाटील दाखल झाले. बंबाच्या सहाय्याने तास न तास मेहनत घेऊन आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत दोन्ही शेतामधील केळी बाग जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले मात्र अधिकृत आकडा पंचनामा झाल्यावरच समोर येणार आहे.