मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुलखात घेतली आहे. या मुलाखतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आजपासून पुढील तीन दिवस या मुलाखतीचे भाग प्रसारित होणार आहे. आजच्या मुलाखतीत पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. राज्यातून भाजपची सत्ता जाण्यामागील कारण देखील त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात जे राजकारण घडले तो अपघात नव्हता. मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगडच्या निवडणुकीनंतर चित्र बदलले होते. महाराष्ट्रातही चित्र बदलण्याच्या तयारीत राज्यातील जनता होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी येणार, मी येणार’ हे विधान राज्यातील सत्ता जाण्यास कारणीभूत ठरल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. ‘मी पुन्हा येईन’ हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचे नसते. मतदाराला गृहित धरले तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलेला नाही, तसा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 105 ही फिगर झाली, त्यात शिवसेनेचं योगदान
२०१४ ते २०१९ पाच सेना आणि भाजपाचे सरकार होते. सरकार जरी युतीचे होते, मात्र भाजपकडून शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आले होते. याचीच नाराजी शिवसैनिकांमध्ये होती. सरकार युतीचे नसून भाजपचेच आहे अशी समज निर्माण झालेली होती.