मंदसौर: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून विरोध होत आहे. मात्र मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस पक्षाचे आमदार हरदीप सिंह डांग यांनी या कायद्याला समर्थन केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याकडे राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) पेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या आमदाराने या कायद्याला समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
काँग्रेसचे आमदार हरदीप सिंह डांग हे मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे.’जर आपण नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी हे वेगळे आहेत या दृष्टीकोनातून पाहिलं तर, त्यात गैर काय आहे. पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमधील पीडित नागरिकांना येथे चांगल्या सुविधा मिळत असतील तर त्यात काय वाईट आहे. पण जे लोक पिढ्यानपिढ्या भारतात राहतात, येथे लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्याकडे एनआरसी अंतर्गत कागदपत्रे मागितली जात आहेत, यावर विचार व्हायला हवा,’ असं आमदार डांग म्हणाले.
काही लोक सीएए आणि एनआरसी या दोन वेगळ्या गोष्टी एकाच चष्म्यातून बघत आहेत. संपूर्ण राजकारण या मुद्द्यावर केंद्रीत झालं आहे, असंही डांग म्हणाले. दरम्यान, यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनीही केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.