‘या’ दिवशी सुरु राहणार मुंबई शेअर बाजार

0

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सादर करणार आहे. यादिवशी पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजार सुरु राहणार असल्याचे पत्रक शेअर बाजाराने प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र २८ फेब्रुवारी रोजी शनिवार असल्याने शेअर बाजार बंद होता. यंदा १ फेब्रुवारी रोजी शनिवार असला तरी मुंबई शेअर बाजाराने व्यवहार सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही मोजक्या राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज चालते.

‘बजेट’चे शेअर बाजारावर पडसाद उमटत असतात. केंद्र सरकार पुढील वर्षभराचे नियोजन मांडत असल्याने त्या त्या क्षेत्रातील शेअरवर गुंतवणूकदरांची नजर असते. बजेटपूर्वी आठवडाभर गुंतवणूकदारांमध्ये सरकारच्या घोषणांची उत्सुकता असते. मागील दशकभरात ‘बजेटच्या’ दिवशी शेअर निर्देशांकावर परिणाम दिसून आला आहे.

गेल्या वर्षी ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला होता. या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.९८ टक्क्यांनी घसरला होता. येत्या १ फेब्रुवारी रोजी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. त्या दिवशी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या वेळेत शेअर ट्रेडिंग होईल, असे ‘बीएसई’ ने म्हटलं आहे. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) अद्याप यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.