मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेच्या युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
घटस्थापनेचा मुहुर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, कागलमधून संजय बाबा घाडगे, चंदगडवरुन संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोल्हापुरात एकूण 10 जागा आहेत. त्यातील सहा शिवसेनेकडे, 2 राष्ट्रवादी, 2 भाजपाकडे आहे. तसेच कोल्हापूरसह रत्नागिरी – दापोली मतदार संघात शिवसेनेकडून योगेश रामदास कदम यांना उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना रामदास कदम यांचा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 144 जागा, मित्रपक्ष 18 तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचे बोलले जात आहे.