रायगड-राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेला आजपासून रायगडातून सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. युती करायची तर करा, लोकांना का फसवता? असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्यावरून टीका केली, ‘अमित शाह यांनी लातूर दौऱ्यावर असतांना शिवसेनेला ‘पटक देंगे’ असा अप्रत्यक्ष टोला लगावला होता. बाळासाहेब असते तर त्यांनी अमित शहांना अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत परत आले नसते’, असे छगन भुजबळ यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.