नवी दिल्ली – पुढच्या वर्षीची लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच येत अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यानं स्वाभाविकच त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, महाविद्यालयीन शिक्षण थोडं स्वस्त करावं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या किंमती कमी कराव्यात, या तरुणाईच्या अपेक्षा आहेत.
देशातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तब्बल 30 टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांकडे रोजगार आणि पुरेसे शिक्षण किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण नसल्याची चिंताजनक आकडेवारी मार्च 2017 च्या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या अहवालातून समोर आली होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नसल्याचे या अहवालातून समोर आले.
गेल्या पाच वर्षांत टेक्नॉलॉजीमध्ये कितीतरी बदल झाले. अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे व्यवहारात बराच सोपेपणा आलेला आहे. दिवसेंदिवस अद्ययावत स्मार्टफोन गरजेचे होत आहेत. निमशहरी भागांमधली तरुणाईही स्मार्टफोन, टॅबलेट्स, स्मार्ट टीव्हीसारखी उपकरणं वापरत आहे. यासारखी गॅजेट्स स्वस्त व्हावीत असं तरुणाईला वाटतंय.