मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विविध मुद्यांवर देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमता विविध मुद्यांवरून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केली. त्याबरोबरच विज्ञान दिवस, जागतिक महिला दिन आणि नॅशनल सेफ्टी डे विषयी चर्चा करतानाच मोदींनी होळीविषयीचे आपले अनुभव सांगितले. तसेच सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिव्यांगांचे जीवन सुधारण्यासाठी मदत
मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 मार्च रोजी असलेल्या नॅशनल सेफ्टी डे बाबत विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सुरक्षेच्याबाबती निष्काळजीपणा न दाखवल्यास जीवन सुरक्षित होऊ शकते. बहुतांश दुर्घटना चुकांमुळे होतात. त्यामुळे चुका टाळल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी एनडीएमए कायम सज्ज असते. एनडीएमएकडून नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोबोट्स, बोट्स आणि स्पेसिफिक टाक्स करणारी यंत्रे बनवण्यास मदत मिळते. आजकाल यंत्रे सेल्फ लर्निंग मधून इंटेलिजेंट आणि स्मार्ट बनत आहेत, त्यामुळे आर्टिफियल इंटेलिजन्सचा वापर करून दिव्यांगांचे जीवन सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का याची चाचपणी व्हायला हवी, असे मोदी म्हणाले.
बोधायन, भास्कराचार्य, आर्यभट यांचा उल्लेख
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज पोहोचलेल्या मुंबई जवळील एलिफंटा येथील 3 गावांचाही मोदींनी उल्लेख केला. तसेच महिलांनी स्वत:च्या आत्मबळाच्या जोरावर स्वत:ला स्वयंपूर्ण बनवल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या मन की बातची सुरुवात नरेंद्र मोदींनी विज्ञान दिवसाच्या आठवणीने केली. यावेळी त्यांनी प्राचीन काळातील बोधायन, भास्कराचार्य आणि आर्यभट यांचा उल्लेख केला. आधुनिक काळातील भारतरत्न सर सी.व्ही. रमन यांचीही आठवण मोदींनी काढली. सर जगदीशचंद्र बोस, हरगोविंद खुराणा यंच्यापासून सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतवासीयांचे भूषण असल्याचे ते म्हणाले.