भुसावळ । येथील नानासाहेब देविदास फालक स्पोर्टस् अकादमीतर्फे आयोजित ऑल इंडिया टी-20 क्रिकेट टुर्नामेंटमध्ये शुक्रवार 17 रोजी दोन उपांत्य सामने खेळविण्यात आले. त्यात पहिला सामना घाटकोपर मुंबई विरुध्द जिनीयस बेकर्स भुसावळमध्ये झाला. यात नाणेफेक घाटकोपर मुंबईने जिंकली व प्रथम गोलंदाजी केली आणि जिनीयस बेकर्सने घाटकोपरसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करतांना मात्र घाटकोपरने 122 धावा काढल्या आणि जिनीयस बेकर्सने हा सामना 27 धावांनी जिंकला.
खलिद अन्सारी ठरला सामनावीर
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सामनावीर म्हणून खलिद अन्सारी या खेळाडूची निवड करण्यात आली. त्याला प्रा.डॉ. नवनीत आसी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिनीयस बेकर्सचे अन्सार यांची उपस्थिती होती. दुसरा सामना जैन इरिगेशन जळगाव विरुध्द नाशिक अकादमी यांच्यात झाला. यात नाणेफेक जैन इरिगेशनने जिंकत प्रथम गोलंदाजी केली. नाशिक अकादमीने 163 धावांचे लक्ष्य जैन इरिगेशनसमोर ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करतांना जैन इरिगेशनने 146 धावा काढल्या व हा सामना नाशिक अकादमीने 16 धावांनी जिंकला. अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात अभिषेक राऊत याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने 55 धावा व तीन गडी बाद केले. असे समन्वयक प्रा. प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.