रसगुल्ला पश्चिम बंगालचाच!

0

न्यायालयाच्या निर्णयामुळे ओदिशाचे तोंड कडू

नवी दिल्ली : बंगाली मिठाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रसगुल्लावर ओदिशाने दावा केल्याने सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. रसगुल्ल्याच्या भौगोलिक हक्कावरून सुरू असलेला वाद पश्चिम बंगालने जिंकला असून, या पदार्थाचा भौगोलिक संकेतांक (जीआय टॅग) पश्चिम बंगालला देण्यात आला आहे. या ’गोड’ बातमीबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बंगाली जनतेचे अभिनंदन केले असले तरी ओदिशाचे तोंड मात्र चांगलेच कडू झाले आहे.

जगन्नाथ देव दाम्पत्याचा ऐतिहासिक संदर्भ नाकारला
सप्टेंबर 2015 मध्ये ओदिशा सरकारने ’रसगुल्ला दिवस’ किंवा ’रसगुल्ला डे’ साजरा करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी दोन्ही राज्यांमधील हे रसगुल्ला युद्ध सुरु झाले होते. ओदिशा सरकारने दावा केला होता की, रथ यात्रेदरम्यान देव जगन्नाथ पत्नी देवी लक्ष्मीला घरी एकटे सोडून गेले होते. यामुळे लक्ष्मी देवी प्रचंड चिडल्या होत्या. त्यांनी जगन्नाथ देवाला घरात प्रवेश देण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांचा राग शांत करण्यासाठी जगन्नाथ देवाने रसगुल्ले दिले होते. पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ला खीरमोहन या नावाने देवासमोर प्रसादासाठी ठेवला जायचा. प्रसादाची ही प्रथा मागील कित्येक दशकांपासून जगन्नाथ मंदिरात राबवली जाते, असे ओदिशा सरकारने सांगितले. पश्चिम बंगालने मात्र ओदिशा सरकारचा हा दावा फेटाळून लावला होता. रसगुल्ल्यासाठी प्रक्रिया केलेले दूध वापरले जाते, जे पुजेसाठी वापरले जात नाही किंवा त्याचा प्रसाद देवाला चढवला जात नाही. त्यामुळे जगन्नाथ देवाने लक्ष्मीला रसगुल्ला देण्याचा काही संबंध नाही, असे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे होते. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?
विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकर्‍यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते. भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते.