माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला. भारताच्या इतिहासातील हे एक गूढ आहे. राजीव गांधींचे मारेकरी जरी लिट्टे (तामीळवाघ) असले, तरी त्यांना सुपारी कुणी दिली? याची शहानिशा कधीच झाली नाही. चौकशी झाली त्या चौकशीला मी सतत जात असे, पण नरसिंह रावने ती चौकशी दाबून टाकली. मी तर त्यावेळेस स्पष्ट म्हटले होते की, राजीव गांधींचे मारेकरीही नरसिंह राव मंत्रिमंडळात काम करत आहेत. म्हणूनच सत्य हे कथा कादंबर्यांपेक्षाही अद्भुत असते. या एका कारणावरून काँग्रेस पक्ष फुटला होता. 2004ला काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मी राजीव गांधींच्या खर्या मारेकर्यांना बाहेर काढा, ही मागणी सातत्याने करत होतो. पण नरसिंह रावप्रमाणेच मनमोहन सिंगनेही ही बाब दाबून टाकली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना मारण्यात परदेशी शक्तीचा मुख्य हात होता. त्यांचा राजीव गांधींच्या हत्येमुळे प्रचंड फायदा झाला. कारण इंदिरा गांधी, राजीव गांधींचे धोरण उलटून खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण अर्थात अमेरिकन भांडवलशाही या देशात आली.
मी अचानक राजकारणात गुप्तहेर खात्यातून आलो, खासदार झालो. दिल्लीला आलो, देशात सर्वात पहिला निकाल माझा लागला, मी मधू दंडवतेना पाडले म्हणून मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 1952 नंतर राजापूर मतदारसंघातून काँग्रेस कधीच निवडून आली नव्हती. त्यात मी नवखा उमेदवार होतो, मी उमेदवार कसा झालो? हा एक राजकीय अभ्यासाचा विषय आहे. मला राजीव गांधींच्या मित्राने खासदार प्रतापराव भोसलेकडे जाण्यास सांगितले, मला तिकीट देण्याविषयी पक्षस्तरावर पुढाकार खासदार प्रतापराव भोंसलेनी घेतला. मला निवडणुकीत उभे करायचे ठरले. पण सैन्याचा राजीनामा देण्याचा मोठा प्रश्न होता. अर्ज करायची शेवटची तारीख 26 एप्रिल 1991 होती. 14 एप्रिलला राजीनाम्याचा निर्णय झाला. एवढ्या लवकर मला सैन्याने सोडणे शक्य नव्हते. राजीव गांधींनी ही कामगिरी फोतेदारना दिली. ते मला रात्री 1 वाजता बिहारचे उद्योगपती खासदार महेंद्र सिंगकडे घेऊन गेले. त्यांनी मला संरक्षण राज्यमंत्री दिग्विजय सिंगकडे नेले, तोपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी राजीनामा मंजूर करून देण्याचे मान्य केले. दुसरे दिवशी सकाळी मी माझा राजीनामा माझे वरिष्ठ कर्नल मल्होत्राना दिला. 16 एप्रिलला 2 दिवसांत तो मंजूर होऊन आला. सारे सैन्यदल अवाक झाले की 2 दिवसांत राजीनामा कसा मिळाला? असो, तेथून राजकीय चक्र फिरू लागले. मला ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली होती. मी चुकून ती कलमाडीना सांगितली आणि सगळे आभाळ फाटले. शरद पवारांनी कोकणातले सर्व नेते दिल्लीत उतरवले. मी दंडवतेचा हस्तक आहे असा प्रचार जोरात केला. शेवटी शरद पवारांच्या गटातील साळवे साहेबांच्या घरी पवार साहेबांसोबत बैठक ठरली. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर, शरद पवारांसोबत माझी बैठक झाली होती, त्यात पवारसाहेबांनी मला पुढच्या निवडणुकीत म्हणजे 1994च्या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केले होते. पुढील निवडणुकीत मी उभे राहायचे जवळजवळ ठरले होते. अविश्वास दाखवायचे मला काहीच कारण नव्हते. माझे वडील 3 वेळा शेकापचे आमदार होते. 1980 ला शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. पण माझे वडील गेले नाहीत. उलट व्ही. पी. सिंग यांनी त्यांना जनता दलाचे तिकीट दिले. त्याला दंडवतेंचाच विरोध होता. म्हणून अनेक जनता दलच्या लोकांनी माझ्या वडिलांविरुद्ध काम करून नारायण राणेना मदत केली तसेच काँग्रेसच्या एका गटानेदेखील नारायण राणेना मदत केली. नारायण राणे शिवसेनेचे उमेदवार यांना दोन्हीकडून मदत मिळाली. थोडक्या मतांनी माझे वडील पराभूत झाले. 1989च्या निवडणुकीत शिवसेनेने दंडवतेना मदत केली होती हेसुद्धा एक कारण होतेच. 1989 हे निर्णायक वर्ष ठरले. एरवी शब्दांचा भडिमार करून लढणारे कोकणी माणूस मुंबईची पार्सल आल्यावर तलवारीने आणि चॉपरने लढू लागला. त्यामुळे आमचे अत्यंत लोकप्रिय नेता श्रीधर नाईकांची हत्या झाली. तेही केवळ निवडणुकीत विरोध केल्यामुळे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांबरोबर बैठक झाली. पवार साहेबांनी विचारले तुझ्याकडे पैसे किती आहेत? मी म्हटले मी सैनिक आहे. माझ्याकडे पैसे कुठून असणार. मग निवडणुकीत कसा उभा राहतो. त्यावर मी म्हटले, तुम्हीच तर मला संगितले होते. ते म्हणाले, हो मी सैनिकाचे काम करायला सांगितले होते, तुमच्या उमेदवारीबाबत गहन विचार करावा लागेल.
त्या दिवसापासून पवारसाहेबांनी माझे तिकीट कापण्यासाठी जंगजंग पछाडले. ते प्रकरण उमेदवार निवड समितीमध्ये गेले. पवार साहेबांनी प्रचंड विरोध केला. त्यांच्या या पावित्र्याकडे बघून मला एन. डी. पाटीलांची आठवण झाली. या घटनेच्या आधी माझ्या सैनिकी निवासस्थानात एन. डी. पाटील आणि माईना मी जेवायला बोलावले होते. त्यावेळी त्यांनी मला स्पष्ट बजावले होते की, जोपर्यंत राजीव गांधी तुम्हाला स्वत: सांगत नाहीत, तोपर्यंत तू कुणावरही विश्वास ठेवू नकोस. राजीव गांधी प्रचंड विरोध पाहता डळमळीत होऊ लागले. त्यावेळेस कै. शंकरराव चव्हाण त्यांच्याकडे गेले व त्यांना सांगितले की, एका तरुण मुलाला तुम्ही सैन्यातून राजीनामा द्यायला सांगितला, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने राजीनामा दिला आहे. आजपर्यंत राजापूर मतदारसंघातून काँग्रेसमधून कुणीच निवडून आले नाही, तर त्याला पडण्यासाठी तरी तिकीट द्या. राजीव गांधींनी मला लगेच बोलावले. ते म्हणाले की तू निवडून येशील असे मला वाटत नाही. मग पडल्यावर काय करणार? मी म्हटले की मी वकिली करेन, काहीही करेन तुमच्या बरोबर निष्ठेने राहीन. माझे तिकीट जाहीर करण्यात आले व मी राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उतरलो.
गोव्याच्या विमानतळावरून मी सिंधुदुर्गाच्या दिशेने गेलो तर महाराष्ट्राच्या सीमेवर तरुणांचा प्रचंड मोठा जमाव दिसला, त्यांनी माझे अतिउत्साहाने स्वागत केले, ही सारी श्रीधर नाईकची फौज होती. कारण ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. पुढे सावंतवाडीला आलो, तेव्हा मी माझे पहिले राजकीय भाषण दिले. त्यात मी जातीयवादी शक्तींना उखडून काढण्याची शपथ घेतली. ती बाब प्रचंड प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच राजापूर मतदारसंघाचा तरुण पेटून उठला आणि मी काहीही न करता प्रचंड प्रमाणात तरुण काँग्रेसमध्ये आले. माझ्या निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यात अनेक ज्येष्ठ नेते होते. सर्वांनी विचारले किती पैसे आहेत? तोपर्यंत माझ्याकडे 30,000 रुपये जमा झाले होते. सर्व ज्येेष्ठ काँग्रेस नेत्यांनी म्हटले की पैसे नाहीत तर कशी काय निवडणूक लढवणार? मी म्हटले मला माहीत नाही. मी राजकारणात नवीन आहे. आपण लोकांकडून गोळा करू. सर्व हसले. काँग्रेस सत्ताधारी पक्ष असताना लोकांकडून पैसे गोळा करायची कल्पनाच अस्वस्थ वाटली. माझ्याकडे प्रचारासाठी गाडीसुद्धा नव्हती. पण एका दिवसामध्ये श्रीधर नाईकने गाडी तयार केली. त्या गाडीत स्पीकर लावले आणि जिथे लोक दिसतील तेथे गाडी थांबवून माझा परिचय द्यायचा आणि मत मागायचो, बरोबर पैसे पण मागायचो. लोकांनी कमाल केली 5-10 रुपये गोळा होऊ लागले आणि त्या निवडणुकीत लोकांनी जवळजवळ 7 लाख रुपये दिले. पक्षाने 5 लाख रुपये दिले आणि 12 लाख रुपयांत मी लोकसभेमध्ये निवडून आलो. समोर भारताचे अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, त्याचबरोबर वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार आणि ज्येष्ठ नेते, यात मी नवखा सैनिक निवडून कसा आलो, याची चर्चा अनेकदा आजदेखील होते. पण मला लोकांनी स्वीकारले आणि मोठे केले त्यांच्याबरोबर मी नेहमीच प्रामाणिक राहिलो. देश आणि जनतेसाठी मी माझ्यापरीने प्रचंड संघर्ष केला आहे व करत राहणार आहे. शेवटी जी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते.
लोकांनी स्वीकारले आणि मोठे केले
जर आपण प्रामाणिकपणे लोकांवर विश्वास टाकला आणि काम केले, तर जनमतही तुम्हाला स्वीकारते. मी पहिल्यांदा जेव्हा खासदार झालो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते.जिथे लोक दिसतील तेथे गाडी थांबवून माझा परिचय द्यायचा आणि मत मागायचो, बरोबर पैसे पण मागायचो. लोकांनी कमाल केली 5-10 रुपये गोळा होऊ लागले आणि त्या निवडणुकीत लोकांनी जवळजवळ 7 लाख रुपये दिले. पक्षाने 5 लाख रुपये दिले आणि 12 लाख रुपयांत मी लोकसभेमध्ये निवडून आलो. मला लोकांनी स्वीकारले आणि मोठे केले, त्याच्याबरोबर मी नेहमीच प्रामाणिक राहिलो. देश आणि जनतेसाठी मी माझ्यापरीने प्रचंड संघर्ष केला आहे व करत राहणार आहे. शेवटी जी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते.
-ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929