राजपूत समाजाला अजूनही न्याय नाहीच

0

दोंडाईचा। देशासाठी शहीद होणारा समाज म्हणुन राजपूत समाजाची जगात ओळख आहे. राज्य, धर्म वाचविणारा हा क्षत्रिय स्वातंत्र्यानंतरही वंचीत आहे. शासनाने आमच्या त्यागाचा बलिदानाचा सन्मान करणे जरूरीचे आहे. याच तत्वांचा सन्मान करूण राजपूत समाजाला आरक्षण द्यावे. क्षत्रिय राजकारणात शिर्षस्थानी नसल्याने देशात अशांतता व असुरक्षीतता निर्माण झाली आहे. आमच्या पुर्वजांनी यामातीसाठी या भुमीसाठी रक्त सांडले आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येच्या 9 टक्के हा समाज आहे. राजपूत समाजाला आजही देशात न्याय मिळत नाही. गुणवत्ता असुन देखील आमचे पाल्यमागे राहतात. त्याला कारण केवळ आरक्षणच आहे. आमच्या मुलांना 80 ते 95 टक्के पर्यंत गुण मिळुन देखील त्यांना अपेक्षीत क्षेत्रात प्रवेश घेता येत नाही. याला जबाबदार व आमच्या पिढ्या बर्बाद करणारे सरकारेसुध्दा देशातुन उखडून लावण्याची ताकद आमच्यात आहे. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता राजपूत समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी सरकारकडे करण्यात येत असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राज्य आरक्षण महामोर्चाचे अजयसिंग सेंगर यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणुन समाजबांधवांजवळ व्यक्त केले.

आरक्षण व जातवैधता प्रमाणपत्र अन्य प्रश्‍नावर चर्चा
दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे सुवर्णकार समाज मंगल कार्यालय येथे धुळे जिल्हा राजपूत समाज व राज्यातील समस्त राजपूत समाज संघटनांच्या वतीने ’राजपूत आरक्षण’ या विषयावर समाजबांधवांची सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत आरक्षण व जातवैधता प्रमाणपत्र यासह अन्य प्रश्‍नावर चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाच्या प्रश्‍नांचे अभ्यासक सज्जनसिंह पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजपूत आरक्षण महामोर्चाचे अजयसिंह सेंगर, क्षत्रिय महासभेचे आंनदसिंग ठोके, नरेंद्रसिंह सौंकुदे, पत्रकार जितेंद्रसिंह राजपूत उर्फ पिंटू दादा, सोमु भैय्या, पंकजसिंग राजपूत, रेनुसिंग सेंगर, परभणी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.संजयसिंह कच्छवे, रवि शेठ आदी उपस्थित होते. यावेळी विविध मान्वरांच्या वतीने राजपूत समाजाच्या अर्थिक सामाजिक प्रश्‍नावर प्रकाश टाकण्यात आला.

सरकारसोबत कायदेशीर लढा
राजपूत समाजाचे गाढे अभ्यासक सज्जनसिंह पवार यांनी सांगितले की, समाजाच्या वतीने सरकारसोबत कायदेशीर लढा चालु ठेवला असुन 1961 ची अट शिथील करणार असल्यांची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी 18 डिसेंबर 2015 रोजीच्या मुंबई येथील मिटींग मध्ये दिली आहे. तर नावापुढे भामटा न लावता सरसकट आरक्षण द्यावे. डॉ.संजयसिंह कच्छवे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, राजपूत समाज सर्व धर्म समभाव जपत असुन एक मेकांना मदत करणारा समाज आहे. जगात जव्हार आणि केसरीया सर्वांत मोठे बलिदान आहे. स्वताच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी महाराणी पदद्मीनी सह 35 हजार राजपूत स्त्रीयांनी जोहर केला. या भुमीसाठी पुर्वजांनी बलीदान दिले. स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन चार जाचक अटी काढल्यास व सर्वांना भामटा न लावता आरक्षण मिळावे. आम्ही राष्टाचे धर्माचे रक्षण करणारे लोक आहोत. असे मत डॉ.कच्छवे यांनी मांडले.

1961 चा पुरावा व्हावा शिथील
आनंदसिंग ठोके यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, राजपूत आरक्षणासाठी 1961 चा राजपूत गुन्हेगार असल्याचा पुरावा शिथील व्हावा. सुलभ पध्दतीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कुठलीही अट न घालता द्यावे. तसेच राजपूत समाज अनेक पोटजातीमध्ये विभागला गेला असुन पोट जातीतील दरी नाहीसी करून रोटीबेटी व्यवहारासाठी प्रयत्न करण्यात येईल. असे सांगितले. कुलदीप राजपूत, करणसिंग राजपूत, जयदेव राजपूत, नारायण राजपूत, दिपक राजपूत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरूणांनी संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आर गिरासे यांनी केले तर चेतन राजपूत यांनी आभार मानले.