मुंबई : राज्यसभेच्या जागांसाठी येत्या २६ मार्च ला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून ४ सदस्यांची निवड होणार आहे. राज्यसभेच्या ४ जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नाराजी पाहायला मिळत होती. अखेर या चौथ्या जागेसाठी तिढा सुटला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड झालं आहे.
शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेच्या चार जागांपैकी
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत. राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे.
भाजप आपल्या आमदारांच्या संख्येवर तीन सदस्य राज्यसभेवर पाठवणार आहे. यामध्ये साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेत पाठवणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर जातील. याशिवाय काँग्रेसकडून युवा नेतृत्त्व राजीव सातव यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.