मुंबई : राज्यात सरकार स्थापन होवून १० दिवस झाले आहे. या दहा दिवसात राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याची टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अस्थिरतेचा फायदा गुन्हेगारांनी उचलला नाही ना? तसेच सरकार स्थापन होऊन खाते वाटप झाले नाही. जबाबादाऱ्या निश्चित झाल्या नाहीत, त्यामुळे पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते असा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर, ठाणे येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार, कल्याण, चेंबूर, वाकोला येथे खून, विरारमध्ये मारहाण, चुनाभट्टी येथे मुलीला गाडीखाली चिरडणे, एमडी ड्रग्सचा साठा जप्त करणे या अशा अनेक गंभीर घटना गेल्या १० दिवसात घडल्या आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे बिघडलेले चित्र जनतेसमोर येत आहे. खून, चोरी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर स्वरुपातील घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण जनतेमध्ये आहे असं आशिष शेलारांनी सांगत तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
तसेच ज्या तत्परतेने आणि जलदगतीने या सरकारने मागील शासनाने घेतलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्याच तत्परतेने आणि जलदगतीने राज्यातील गुन्हेगारीला स्थगिती मिळविण्यासाठी काम करावं अशा टोला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.