मुंबई: राज्यात आज पुन्हा चार नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. पुण्यात तीन तर साताऱ्यात एक करोना रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे. राज्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.
राज्यात काल रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. तर एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. काल दिवसभरात राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७वर पोहोचली होती. त्यात आज चार रुग्णांची भर पडली आहे. सातारा, सांगली सारख्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलले असून राज्यात आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरीही मुंबई-पुण्यातील काही लोक बेपर्वाईने वागत असल्याचं दिसून आल्याने सरकारने या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.