मुंबई: राज्यातील कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांत पुरेशी काळजी घेऊन, लॉकडाऊनबाबतच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरू केले जाणार आहेत. या लॉकडाऊनसंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून त्यात कशाप्रकारे सूट मिळणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित टेवून कंटेनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, शेती, फळबागा व शेतीपूरक उद्योग, नारळ, काजू आणि मसाला बागांमधील कामे, कुक्कुट पालन, बँकांच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कुठल्याही कारणांसाठी गर्दी चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थना स्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू मात्र विनाअडथळा मिळत राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
महत्त्वाचे…
१) शासकीय कार्यालयांत १० टक्के कर्मचार्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. बस आणि बेस्ट बसची विशेष सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
२) शासकीय कार्यालय आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्या अधिकारी-कर्मचार्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत २१ एप्रिलपासून मंत्रालयापर्यंत अतिरिक्त फेर्या सुरू करण्याचे नियोजन.
३) शेती, शेतीपूरक उद्योग, द्राक्ष उत्पादक, मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ई-कॉमर्स व्यवसाय, कम्युनिटी किचन याबाबत संबंधित यंत्रणांनी केंद्रीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आदेश.