राज्यातील न्यायालयांमध्ये आवश्यक सुविधा पुरविणार

0

पुणे । राज्यातील न्यायालयांच्या इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील कौटुंबीक न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. कौटुंबीक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश एस. एस. सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती भूषण गवई, पालकमंत्री गिरीश बापट, कौटुंबीक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, गणेश कवडे, महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.

देशातील आदर्श कौटुंबीक न्यायालय पुण्यात झाले आहे. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल तर कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्यासाठी न्यायालयांमध्ये चांगल्या सुविधा आवश्यक आहेत, असे सांगत समाजातील एकत्र कुटुंब पध्दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबीक वादाचे प्रमाण वाढत आहेत. न्यायालयाच्या या वातावरणामुळे त्यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्फोटासाठी आलेल्या व्यक्ती परत आनंदात एकत्र जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबीक न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये विविध अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

प्रत्येकाबद्दल सहानुभूती ठेवा
जीवनात सुबत्ता असलेल्या व्यक्ती कौटुंबीक कलहामुळे त्रस्त असल्याची उदाहरणे देऊन कौटुंबीक न्यायालयांमध्ये येणार्‍या व्यक्तींच्या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणार्‍यांवर असल्याचे डॉ. चेल्लूर यांनी सांगितले. कौटुंबीक न्यायालय हे एक वेगळे आणि विशेष न्यायालय आहे. इथे येणार्‍या व्यक्तींबाबत सर्वांनी सहानुभूतीचा, आपुलकीचा दृष्टिकोन ठेवावयास हवा, असे आवाहन त्यांनी केले. आत्मविश्वास गमावलेल्या, नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनात शांतता निर्माण करण्याचे, त्यांचे जीवन घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्याला करावयाचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.