मुंबई: कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान आता अनलॉकमध्ये हळूहळू अनेक उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येत आहे. राज्यातील हॉटेल्सही लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु करण्याचा विचार आहे.” यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.