नागपूर: राज्यात मोठ्या प्रमाणात शासकीय पडे रिक्त आहेत. नोकर भरती करण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे अनेक विभागातील भरती रखडली होती. दरम्यान आता राज्यात पोलीस भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. नागपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. पण, याबाबत आम्ही मराठा नेत्यांशी चर्चा असून त्यांना राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेला सहमती दर्शविली दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
२६ जानेवारी पासून येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांना दिली. भारतातील पर्यटनाचा हा पहिला उपक्रम असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.